- राज्य
- '... तोपर्यंत विरोधक कायम मातीतच जाणार'
'... तोपर्यंत विरोधक कायम मातीतच जाणार'
शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर
मुंबई: प्रतिनिधी
विरोधक जोपर्यंत आत्मपरीक्षण करून आपल्या चुका मान्य करत नाहीत, त्या दुरुस्त करत नाहीत तोपर्यंत ते कायम मातीतच जात राहणार, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या बिहार निवडणूक निकालाबाबत आरोपाला प्रतिउत्तर दिले आहे.
जनतेच्या हिताच्या योजना आणि निर्णय घेण्यास सर्वांना स्वातंत्र्य होते. आता विरोधात बसलेले जेव्हा सत्तेवर होते तेव्हाही त्यांनाही संधी होती. त्यांनी ती साधली नाही. आम्ही जनतेच्या हिताच्या अनेक योजना राबवल्या. अमलात आणल्या. लोकांना त्या आवडल्या. मतदारांनी आम्हाला मतदान केले, असे फडणवीस म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्याबाबत विचारणा केली असता फडणवीस म्हणाले की, राज्यातील काही प्रश्नांबाबत अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली असावी. मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्चा निर्णय काँग्रेसने घेतला आहे त्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, सगळे विरोधी पक्ष एकत्र निवडणूक लढवतात की स्वबळावर लढवतात याला भाजपच्या दृष्टीने महत्त्व नाही. मुंबईकरांचा अधिक विश्वास महायुती वरच आहे. त्यामुळे ही निवडणूक आम्हीच जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शरद पवार यांनी महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी महिला मतदारांना दहा हजार रुपये सरकारने दिले. अशा प्रकाराने सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गरवापर करून पैशाचे वाटप केले. निवडणूक आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केले, बिहारमध्ये जे घडले ते यापूर्वी आम्ही भोगले आहे, अशी प्रतिक्रिया निवडणूक निकालावर व्यक्त केली होती.

