- राज्य
- '.... मग महापालिका निवडणुका वेगवेगळ्या का लढवता?'
'.... मग महापालिका निवडणुका वेगवेगळ्या का लढवता?'
खुद्द शरद पवार यांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना कळीचा सवाल
मुंबई: प्रतिनिधी
मतचोरीच्या मुद्द्यावर, सत्याच्या मोर्चात एकत्र वावरता मग महापालिकेची निवडणूक वेगवेगळी का लढवता, असा कळीचा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांना केला आहे. याला महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून काय प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी यापूर्वीच एकला चलो रे चा नारा दिला आहे. मात्र, वर्षा गायकवाड यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेऊन मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सहकार्याचा हात मागितला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी महाविकास आघाडी समोर उभा केलेल्या सवाल कळीचा ठरणार आहे.
राज्यातील महापालिकांच्या, विशेषता मुंबई महापालिकेची निवडणूक ही सत्ताधाऱ्यांसाठी प्रतिष्ठेची तर विरोधकांसाठी अस्तित्वाची ठरणार आहे. ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच काही काळापूर्वी ठाकरे बंधू एकत्र आले. मराठी मतांचे विभाजन होऊ नये अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र, काँग्रेस मनसेला महाविकास आघाडीत सामावून घेण्यास तयार नाही. मनसे हा पक्ष आणि त्याचे नेते राज ठाकरे हे विद्वेष पसरवणारे आणि दडपशाही करणारे असल्याची टीका काँग्रेसने यापूर्वीच केली आहे.
शरद पवार यांनी महाविकास आघाडी समोर उभ्या केलेल्या प्रश्नानंतर शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडी म्हणून शरद पवार आणि काँग्रेस बरोबर येणार की मनसे बरोबर जाण्याचा निर्णय घेणार, शरद पवार महाविकास आघाडीने निवडणूक लढवण्याचा आग्रह धरणार की आणखी काही वेगळेच समीकरण जुळवणार, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

.jpg)