सिंधुदुर्ग: प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी अशी आमची इच्छा होती. मात्र, भारतीय जनता पक्षाला आमच्याशी युती करायची नव्हती. त्यामुळे त्यांनीच कोकणात महायुती संपुष्टात आणली, असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी केला आहे.
जिल्ह्यात आणि कणकवली नगर परिषद निवडणुकीत महायुती कायम राहावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र, भाजपला आमच्याशी युती करायची नव्हती. त्यामुळे ज्यांना आमच्याशी युती करायची होती त्यांच्याकडे आलो आहोत, असे राणे यांनी स्पष्ट केले.
कणकवली नगर परिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध इतर सर्व पक्ष अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या सर्वांनी एकत्र येऊन या निवडणुकीसाठी शहर विकास आघाडी स्थापन केली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजपा बरोबर आहे.
राजन तेली यांच्या निवासस्थानी शहर विकास आघाडी सहभागी असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन केले. यावेळी राणे यांनी नेत्या कार्यकर्त्यांना संबोधित केले.
या निवडणुकीच्या निमित्ताने निलेश आणि नितेश राणे हे दोघे बंधू एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. नितेश राणे हे भारतीय जनता पक्षात असून राज्यात मंत्री आहेत तर निलेश राणे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षासाठी 100% योगदान द्यावे, अशी शिकवण आपले वडील नारायण राणे यांनी आपल्याला दिली आहे. त्यामुळे शहर विकास आघाडीला विजयी करण्यासाठी आपण कंबर कसून तयार आहोत, असे त्यांनी सांगितले.

