- देश-विदेश
- सविस्तर वक्तव्यापेक्षा सुभाषितातून आशय लवकर कळतो: नरेंद्र मोदी
सविस्तर वक्तव्यापेक्षा सुभाषितातून आशय लवकर कळतो: नरेंद्र मोदी
संस्कार भारतीचे पुस्तक प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते
पुणे: प्रतिनिधी
एक लांबलचक भाषण ऐकून जे आकलन होत नाही, ते एका सुभाषितातून पटकन समजते एवढी प्रगल्भता संस्कृत सुभाषितांमधे आहे असे उद्गार माननीय पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी संस्कृतभारतीच्या कार्यकर्त्यांसमोर काढले.
'मन की बात' या कार्यक्रमात व 'संसदेत' आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लिखित केलेल्या सुभाषितांचे तसेच सूक्तींचे संकलन पुस्तक रूपाने संस्कृतभारतीच्या (विदर्भ) न्यासाने प्रकाशित केले आहे. पुस्तकाचे नाव आहे "उद्गारा:".
संस्कृतभारतीच्या पुणे येथील कार्यकर्त्या वैखरी कुलकर्णी (सेनाड) व रंजना फडणीस यांनी पुस्तकाचे संपादन केले आहे. या पुस्तकात मोदीजींनी उद्धृत केलेल्या सुभाषितांचे तसेच सूक्तींचे पदच्छेद व अन्वयासह संस्कृत, हिंदी, मराठी व इंग्रजी अर्थ दिलेले आहेत. सुभाषितांचा स्रोत लिहिला आहे. सोबतच सुभाषिताशी सम्बन्धित पारंपारिक अथवा ऐतिहासिक कथा निरूपित केली आहे. कुठल्या संदर्भात सुभाषित ऐकविले, तो संदर्भ माननीय मोदींच्या शब्दात लिहिला आहे.
लेखिकांच्या टिप्पण्यांमुळे सुभाषितांबद्दल अतिरिक्त माहिती वाचकाला प्राप्त होणार आहे. एवढेच नाही तर पल्लवी पंडित यांनी काढलेल्या शंभरावर चित्रांमुळे सुभाषितांचा अर्थ अधिक स्पष्ट होतो. रंगीत चित्रांमुळे पुस्तक आकर्षक झाले आहे. त्यामुळे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात हे पुस्तक सर्व वयोगटातील व्यक्तींना मार्गदर्शक ठरणार आहे.
संस्कृतभारती (विदर्भ) न्यासातर्फे हे पुस्तक सन्माननीय पंतप्रधानांना भेट देण्यासाठी न्यासाचे पदाधिकारी, तसेच संकलनाकर्त्या दिल्ली येथे गेल्या होत्या. आदरणीय प्रधानमंत्री यांच्या निवासस्थानी हा समर्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी संस्कृतभारतीचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख श्रीशजी देवपुजारी उपस्थित होते. श्रीश देवपुजारी यांनी दोन तप (२४ वर्ष) सत्तेच्या केन्द्र स्थानी राहून देशसेवा केल्याबद्दल पूर्वप्रचारक मोदीजींचा सत्कार केला.
या प्रसंगी बोलताना मोदी म्हणाले की, भाषणात सुभाषिते वापरण्याची प्रेरणा मला सरसंघचालक बाळासाहेब देवरसांकडून मिळाली. ते सुयोग्य सुभाषितांचा उपयोग करून विषय समजावीत असत. काही काळापूर्वी संस्कृत ही केवळ विद्वानांची भाषा होती. संस्कृतभारतीने ती सुलभरीत्या सर्वत्र पसरविली, असा अभिप्रायही मोदी यांनी दिला. जिज्ञासा असेल, तर कृती घडते, जिज्ञासा जागी झाली पाहिजे, असेही मोदी यांनी नमूद केले.

